विजयासाठी मिळालेल्या १७० धावांचा पाठलाग करताना हार्दिक पंड्याच्या मुंबई इंडियन्सला कोलकाता नाईट रायडर्सने १४५ धावांत गुंडाळत प्लेऑफची आपली जागा जवळपास निच्चीत केली. तर दुसरीकडे आठ पराभवांसह मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाहेर फेकला गेला.
मुंबई: पाच वेळेस चॅम्पियन्स ठरलेल्या मुंबई इंडियन्सला आपल्या घरच्या मैदानावर केकेआरकडून पराभवाला समोर जावे लागले. एक सोपा वाटणारा विजय फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे हातातून निसटला आणि यंदाच्या आयपीएलमधून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली. मुख्य म्हणजे केकेआरविरुद्ध चांगला रेकॉर्ड असतानादेखील मुंबई इंडियन्सच्या प्रमुख फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी शरणागती पत्करली.
१७० धावांचा सोपा वाटणारा लक्ष फलंदाजांच्या चुकांमुळे कसा कठीण होत गेला हे त्यांना कळलेच नाही. ईशान किशन (१३), नमन धीर (११), रोहित शर्मा (११) या तिघांना पावरप्लेमध्येच बाद करीत केकेआरने आपले मनसुबे स्पष्ट केले. घटक वाटणाऱ्या सूर्यकुमार यादवने काहीसा प्रयत्न केला पण अर्धशतक लगावल्यानंतर रसेलकरवी बाद होत मुंबईच्या आशेवर विरजन पडले. टीम डेव्हिडवर शेवटची आस लावून बसलेल्या समर्थकांना स्टार्कने १९व्या षटकात त्यालाही बाद करीत कोलकाताच्या २४ धावांनी विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, अस्तित्वाच्या लढाईत मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केल्यानंतर वेंकटेश अय्यर आणि ‘इम्पॅक्ट’ प्लेयर म्हणून मैदानात उतरलेल्या मनीष पांडे (४२) या जोडीने कोलकाताला महत्वपूर्ण ८३ धावांची भागीदारी रचून समाधानकारक धावसंख्येकडे आगेकूच केली. पहिल्या षटकापासून विकेट्सची सुरु झालेली गळती अगदी पावरप्ले संपल्यानंतरही सुरुच राहिली. पहिल्या सहा षटकांत आघाडीचे चार फलंदाज माघारी परतल्यानंतर लगेचच टी-२० विश्वचषकाच्या १५ जणांच्या चमूमध्ये समावेश न झालेल्या रिंकू सिंहला पियुष चावलाने माघारी धाडत केकेआरची स्थिती पाच बाद ५७ अशी दयनीय केली होती.
स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर असलेल्या मुंबई इंडियन्सला करो वा मरो लढतीत आज पुन्हा एकदा गोलंदाजांनी साथ दिली. केकेआरचा निम्मा संघ केवळ ५७ धावांत गारद केल्यानंतर झालेल्या भागीदारीला हार्दिक पंड्याने लगाम लावत एका मोठ्या धावसंख्येपासून रोखले. विस्फोटक आंद्रे रसेलला धावबाद करीत मुंबईने जवळपास २०-३० धावा वाचवल्या. उरलेल्या फलंदाजांना बुमराने आपल्या जादुई गोलंदाजीवर नाचवत केकेआरला १६९ धावांवर बाद केले. बुमराच्या जोडीलाच नुवान थुसारा तीन तर हार्दिकने दोघा फलंदाजांना बाद केले. बुमराने आणखी एक यॉर्करवर वेंकटेश अय्यरला ७० धावांवर बाद करीत केकेआरचा डाव संपवला.
- बुमराचे वानखेवर ५० बळी. लसिथ मलिंगा (६८) नंतर मुंबई इंडियनसाठी एका मैदानावर सर्वाधिक बळी घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे.